सोलापूर : माळशिरस तालुक्यातील चौडेश्वरवाडी येथे उषा साठे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील तपासात होत असलेली दिरंगाई अस्वीकार्य असून,या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी ठाम मागणी सोलापूर येथील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त शिष्टमंडळाने केली.
दि. ६ जुलै २०२६ रोजी उषा साठे या मातंग समाजातील महिलेची एफआयआरनुसार सचिन जगन्नाथ देशमुख याने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेला आठवडा उलटूनही सर्व आरोपींना अटक झालेली नसून तपास संथ गतीने सुरू असल्याबद्दल शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील अनुसूचित जाती, मुस्लिम, ओबीसी समाजासह विविध घटकांच्या प्रतिनिधींनी अकलूज पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तपासात कोणतीही कुचराई किंवा दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात राष्ट्रीय रविदास महासंघाचे अशोक आगावणे, आरक्षण एकता समितीचे आप्पासाहेब लोकरे,मुस्लिम शाहू-फुले-आंबेडकर मंचचे फारुख शेख,प्रा.सिद्धार्थ जाधव,ॲड. श्रीकांत बनसोडे,शंशाक कांबळे,संगीता आगावणे,सुशील विचारधारेचे सच्चिदानंद व्हटकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी मृत उषा साठे यांचे पती श्री. साठे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शिष्टमंडळाने निष्पक्ष, वेगवान आणि प्रभावी तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
