सोलापूर : राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान अनेक भागांत वादळी पाऊस, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानातील अचानक बदलामुळे शेतात साठवून ठेवलेले किंवा काढणी करून मळणीसाठी ठेवलेले धान्य,हरभरा,गहू आदी पिकांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत तसेच शक्य असल्यास ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटने झाकून ठेवावीत.
तसेच शेतातील फळबागा,भाजीपाला आणि इतर पिकांचेही वादळी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनीही सुरक्षिततेची काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान,पुढील काही दिवस हवामानात बदल राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत,असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
