सोलापूर : मराठा सेवा संघ हा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत असलेल एक प्रभावी संघटन असून, समाज बांधवांना एकत्र आणून त्यांची प्रगती साधणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे यांनी केले.
सोलापूर येथे शनिवारी पार पडलेल्या केंद्रीय कार्यकारणी सोलापूर शहर-जिल्हा व पंढरपूर विभागाच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत संघटनेच्या विस्तारावर विशेष भर देण्यात आला. विविध स्तरातील समाज बांधवांना संघटनेशी जोडून मराठा सेवा संघाची कक्षा अधिक व्यापक करण्याचे आवाहन शिखरे यांनी केले. तसेच,संघटनेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी दर महिन्यांला नियमित बैठक घेण्याचा निर्णयही सूचित केला.
शिखरे यांनी संघटनेमध्ये सक्षम,सक्रिय व समर्पित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोच वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजातील प्रश्न जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणे ही संघटनेची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी समाजात निर्माण होत असलेल्या विवाह जुळवणीतील अडचणी व विवाहानंतर उद्भवणाऱ्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर मार्ग काढण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष संदीपान जाधव यांनी सेवा संघाच्या बचत गटातील जालना जिल्ह्याची यशोगाथा सांगितली तर नेताजी गोरे यांनी सोलापूर जिल्हा मराठा सेवा संघाच्या वाटचालीचा प्रेरणादायी प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कार्याचा आढावा देण्यात आला व आगामी काळातील नियोजनावरही चर्चा झाली. पुणे विभागिय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले. या बैठकीस अमित निमकर,जी.के.देशमुख,सदाशिव पवार,उज्वला साळुंखे,सोमनाथ राऊत,दिनेश जगदाळे,प्रकाश ननवरे यांच्यासह सेवासंघाचे,सर्व कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
