Ticker

6/recent/ticker-posts

अजित पवारांचा ढोंगी चेहरा उघडा पडला - जे. डी.शाह

आमदार संग्राम जगतापांचा द्वेष,अजित पवारांचा ढोंगी चेहरा उघडा पडला - जे. डी.शाह

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अहिल्यानगर  जिल्ह्यातील आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीच्या निमित्ताने हिंदू लोकांना केलेले आवाहन - "दिवाळीची खरेदी फक्त हिंदू दुकानदारांकडून करा,जेणेकरून मुसलमान व्यापाऱ्यांना फायदा होणार नाही" - हे केवळ वादग्रस्तच नाही,तर थेट सांप्रदायिक द्वेष पसरविणारे आहे. आणि या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया? फक्त एक 'शोकाज नोटीस'! हे पुरेसे नाही. हे दोघेही - जगताप आणि पवार - महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला धक्का देणाऱ्या या घटनेस जबाबदार असुन आमदार संग्राम जगतापांचा द्वेष हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खरा ढोंगी चेहरा उघड पडला आहे. असा आरोप जेष्ठ समाजसेवक जे.डी.शाह यांनी ऐका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.


   
पत्रात पुढे म्हटले आहे की सर्वप्रथम,संग्राम जगताप यांच्या विधानाकडे पाहू. सोलापूर जिल्ह्यातील एका हिंदू रॅलीत बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले, "दिवाळीच्या निमित्ताने तुमची खरेदी,तुमचा नफा फक्त हिंदू लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मुसलमानांकडून काहीच खरेदी करू नका." हे विधान केवळ आर्थिक बहिष्काराची मागणी नाही,तर मुसलमान समुदायाला थेट लक्ष्य करणारा द्वेषाचा विषारी प्रचार आहे. दिवाळी ही सणाची आनंदाची वेळ असते,जिथे सर्व धर्म,सर्व जाती एकत्र येऊन साजरा करतात. पण जगतापांसारखे नेते या सणाला सांप्रदायिक रंग देऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. हे विधान केवळ चुकीचे नाही,तर भारतीय घटनेच्या सेक्युलर तत्त्वांचा उल्लंघन करणारे आहे. अशा नेत्यांना आमदार म्हणून विधानसभेत बसण्याचा अधिकारच नाही. त्यांना तुरुंगात टाकणे हेच योग्य आहे,कारण हे विधान थेट धार्मिक द्वेष भडकावण्याचे कटकारस्थान आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाच्या इतिहासात शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या सेक्युलर नेत्यांचा वारसा हा पक्ष चालवितो आहे. असा पारावार उल्लेख अजित पवारांकडून उच्चारला जातो मात्र जगतापांसारखा आमदार हा वारसा मागे टाकून सांप्रदायिक राजकारण करतोय,हे लज्जास्पद असुन फुले,शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारा ठरत आहे.




सध्या अजित पवार यांच्याकडे राज्याची फार मोठी जबाबदारी असुन उपमुख्यमंत्री म्हणून ते राज्य चालवतात आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत. पण त्यांची प्रतिक्रिया? "हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही शोकाज नोटीस देऊ" असं म्हणून भाग पाडण्याचा प्रयत्न. हे काय,फक्त कागदावर नोटीस देऊन जबाबदारी संपली? जगताप यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,संपूर्ण देश त्यावर बोलतोय,आणि पवार साहेब फक्त नोटीसची धमकी देतात? हे केवळ ढोंगीपणा आहे. जर पक्षाच्या धोरणानुसार अशी विधाने चुकीची आहेत,तर लगेच कारवाई का नाही? आमदाराला पक्षातून बाहेर काढणे, त्याची सदस्यता रद्द करणे किंवा कायद्याच्या कचाट्यात घेणे-हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. पण पवार नोटीशी पुरते मर्यादित राहिले. यामुळे प्रश्न उपस्थित होतो: खरंच ते सेक्युलर आहेत का,की फक्त निवडणुकीसाठी मुसलमान मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे ड्रामा? त्यांच्या पक्षाने आधीच अनेकदा अशी वादग्रस्त विधाने झाकली आहेत. जगतापांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर 'पित्याच्या छत्राखाली नसल्याने जबाबदारी वाढली आहे' असं पवार म्हणाले,पण हे बोलून भाग कसा? जगताप सतत अशी विधाने करत असल्याचे बातम्यांमध्ये दिसते - जसे की जूनमध्ये मुसलमाना विरोधात केलेली टीका. पवार,तुम्ही उपमुख्यमंत्री आहात,तरीही तुमच्या आमदारांना सांप्रदायिकतेच्या आगीत भडकण्यास सोडले आहात का? असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.




पुढे म्हटले आहे की महत्त्वाचे म्हणजे,या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा धुळीला मिळतेय. पक्षाचे बीड जिल्ह्यातील नेते फारुख पटेल,अशफाक इनामदार ,बरकत पठाण यांनीही पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणतात, "अशी विधाने केल्यास मुसलमान मतदार पक्षापासून दूर जातील." हे खरे आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपसारखे पक्ष सध्या सांप्रदायिक राजकारण करत आहेत,आणि राष्ट्रवादीला सेक्युलर म्हणून ओळखले जाते. पण जगतापांसारखे नेते आणि पवारांची दुर्बल कारवाई यामुळे हा वारसा धोक्यात आहे. अजित पवार यांनी लगेच जगतापांच्या कानाखाली वाजवून पक्षातून हद्दपार करायला हवे होते. नोटीस देऊन वेळ मारुन नये. अन्यथा,हा पक्ष खऱ्या अर्थाने 'राष्ट्रवादी' राहणार नाही,तर फक्त सत्तेसाठी सांप्रदायिकतेच्या खेळात सामील झालेलाच पक्ष आहे असा ठाम विश्वास जनतेमध्ये रुजत आहे.



    
पत्रात  शेवटी म्ह्टले की अंतिमदृष्ट्या,ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेचा इशारा आहे. दिवाळी ही सर्वांसाठी आहे - हिंदू, मुसलमान,ख्रिश्चन,सर्व. अशा नेत्यांना रोखणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. अजित पवार आणि संग्राम जगताप,तुमची ही कृत्ये महाराष्ट्राच्या सेक्युलर वारसाला कलंक आहेत. लगेच कारवाई करा,अन्यथा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही! असा इशारा जेष्ठ समाजसेवक जे.डी.शाह यांनी केला आहे.