सोलापूर : दि.०२ (एमडी२४न्यूज) राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग होऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन,अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम सन २०२४ पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू,हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीकस्पर्धेसाठी ज्वारी,गहू,हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० राहील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. तसेच पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ),ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा,जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास),पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा,बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीक निहाय राज्य पातळी प्रथम क्रमांक ५०००० रुपये, द्वितीय क्रमांक ४०००० रुपये, तृतीय क्रमांक ३००००, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक १०००० रुपये, द्वितीय क्रमांक ७००० रुपये,तृतीय क्रमांक ५०००, व तालुका पातळीवरील प्रथम क्रमांक ५००० रुपये, द्वितीय क्रमांक ३००० रुपये, तृतीय क्रमांक २००० रुपये असे बक्षिसाचे स्वरुप राहील.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अथवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी. असे आवाहनही कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) नाईकवाडी यांनी केले आहे.
