सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे
सोलापूर : दि.२३ (एमडी24न्यूज) गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होत आहे. याबरोबरच शासनाचा महसूल बुडत असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक असून यासाठी गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा,अशा सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिल्या.
उपविभागीय अधिकारी कार्यालय,सोलापूर क्र -2 अधिनस्त तहसिल कार्यालय,अक्कलकोट,अपर तहसिल कार्यालय,मंद्रुप व तहसिल कार्यालय,दक्षिण सोलापूरच्या सर्व तहसिलदार व मंडळ अधिकारी यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
केंद्र शासनाच्या पर्यावरण,वन व वातावरणीय बदल - मंत्रालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच सर्वोच्च न्यायालय,उच्च न्यायालय व हरित लवादाचे निकष यांचे अवलोकन करावे,असे सांगण्यात आले. बैठकीत अवैधरित्या होत असलेल्या वाळू, मुरुम या गौण खनिजाच्या उत्खनन,वाहतूक व साठ्याबद्दल आढावा घेण्यात आला.
गौण खनिज चोरीची स्थळे शोधून अशा ठिकाणी - मंडळ अधिकारी,तलाठी,पोलीस पाटील यांची संयुक्त स्थिर पथके, भरारी पथके तैनात करावीत. पथकाकडून गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर दंडनीय तसेच मुद्देमाल जप्तीची कारवाई करावी.
गौण खनिज उत्खनन, वाहतूक अगर साठा करणाऱ्यांवर शासन नियमातील तरतुदीनुसार फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आव्हाळे यांनी तहसिलदार व मंडळ अधिकारी यांना दिले.