सोलापूर : दि.११ (प्रतिनिधी) भगवान मारुती लामतुरे वय 72,रा.कामती (खू) ता.मोहोळ,जि.सोलापूर याचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्याची दोन मुले दत्तात्रय भगवान लामतुरे व संजय भगवान लामतुरे,दोघे रा.कामती (खू),ता.मोहोळ,जि. सोलापूर यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की,मयत भगवान याच्या नावे शेतजमीन होती,जमिनीतील पिकाचे गारपीटीमुळे नुकसान झाले होते, त्यामुळे शासनाकडून 15000 रुपयाचे गारपीटग्रस्तांसाठी अनुदान आले होते,ते वेळोवेळी मागूनही वडिलांनी वाटून न दिल्यामुळे आरोपी हे वडिलांवर चिडून होते,त्यातूनच दि:-28/5/2017 रोजी सकाळी 9:30 वाजता राहते घरात घुसून दोन्ही आरोपींनी मयतास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व ही बाब घरामध्ये असणारी मयताची सून हिने पाहिले, तसेच दोन्ही आरोपीस मारहाण करून घरातून बाहेर पडताना फिर्यादी विजय यानेही पाहिले होते व लगेच वडिलांना खाजगी दवाखान्यात व नंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले असता ते दि:- 5/6/2017 रोजी मयत झाले, घटनेची फिर्याद मयताचा मुलगा विजय लामतुरे यांनी कामती पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती,त्याची चौकशी होऊन पोलिसांनी दोषारोप पत्रक दाखल केले होते. सदर खटल्यात एकंदर 7 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात फिर्याद उशिराने दिलेली आहे, प्रत्यक्ष घटना पाहणारी साक्षीदार हिचा फिर्यादीत उल्लेख केला नाही,त्यामुळे साक्षीदार सांगतात तशी घटना घडली यावर विश्वास ठेवता येणार नाही,असे मुद्दे मांडले,ते ग्राह्य धरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ऍड.मिलिंद थोबडे,ऍड.विनोद सूर्यवंशी, ऍड.किरण सराटे, ऍड.दत्ता गुंड तर सरकारतर्फे ऍड ए.जी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.