विमानसेवा,पाणीपुरवठा,सार्वजनिक परिवहन, ५४ मीटर रस्ता, IT पार्कसह शहराच्या विकासाच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारणार
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंच आक्रमक झाला आहे. शहरातील विमानसेवा,पाणीपुरवठा,सार्वजनिक परिवहन,रस्ते,पूल,हद्दवाढ भागातील मूलभूत सुविधा,शिक्षण,उद्योग व आय.टी.क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित २० ऑगस्टच्या सोलापूर दौऱ्यापूर्वी शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधण्यासाठी मंगळवार,दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेटसमोर) एकदिवसीय भव्य निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोलापूर विकास मंचची बैठक १४ ऑगस्ट शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या आवारातील हॉटेल समृद्ध येथे पार पडली. बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून प्रशासनाने ठोस आणि कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
विमानसेवा सुरळीत ठेवण्यासाठी नाईट लँडिंगची तातडीची गरज - होटगी रोड येथील सोलापूर विमानतळावर सध्या सुरू असलेल्या विमानसेवा सातत्याने आणि सुरळीत सुरू राहण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. विमानसेवेच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सोलापूरकरांना पुरेशी व स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.
विमानसेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक बाबी आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रियांबाबत स्पष्टता निर्माण करून सोलापूरच्या हवाई वाहतुकीला दीर्घकालीन स्थैर्य मिळवून देण्याची मागणी मंचाने केली.
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी - सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्नही बैठकीत चर्चेचा प्रमुख विषय ठरला. शहराला उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून दररोज ठरावीक वेळेत आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांना पाणी कधी मिळणार याबाबत अनिश्चितता राहू नये आणि पाणीपुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता असावी,यावर बैठकीत भर देण्यात आला.
शहर परिवहन सेवा सुरू करताना जुन्या चुका टाळण्याची मागणी - सोलापूर शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था तातडीने सुरू करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. नव्याने दाखल झालेल्या बसेसची देखभाल, गुणवत्ता आणि दीर्घकालीन कार्यक्षमता याबाबत योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
पूर्वी JNNURM अंतर्गत आलेल्या बसेसची झालेली अवस्था पुन्हा होऊ नये, तसेच नव्या बससेवेच्या नावाखाली सोलापूरकरांची फसवणूक होऊ नये,यासाठी पारदर्शक व्यवस्था,नियमित देखभाल आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी मंचाने केली.
कंबर तलाव-पत्रकार भवन पुलाचे रुंदीकरण तातडीने करा - कंबर तलाव परिसरातील पत्रकार भवनाजवळील पुलाचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पुलाचे काम तातडीने हाती घ्यावे,अशी मागणी करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या पुलांचे आणि रस्त्यांचे नियोजनबद्ध रुंदीकरण आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
हद्दवाढ भागातील जुन्या सोसायट्यांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी - सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील २०२० पूर्वी अस्तित्वात असलेल्या रहिवासी सोसायट्यांचे हस्तांतरण करून त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी करण्यात आली. पाणी,रस्ते, ड्रेनेज,पथदिवे,स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवणे योग्य नसल्याचे मंचाने स्पष्ट केले.
इंजिनिअरिंग कॉलेज,महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मिलेट सेंटरचा प्रश्न कायम - सोलापूरमधील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज,डफरीन चौकातील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्नधान्य-मिलेट सेंटर यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प अद्याप अपेक्षित गतीने सुरू झालेले नाहीत. रोजगार,कौशल्यविकास आणि शिक्षणाच्या दृष्टीने या प्रकल्पांना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी बैठकीत करण्यात आले.
५४ मीटर रस्त्याचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याची मागणी - छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव या ५४ मीटर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन काम पुन्हा सुरू करावे,अशी मागणी करण्यात आले.
अशास्त्रीय स्पीड ब्रेकर हटवा; खड्डे तातडीने बुजवा - सोलापूर शहरातील विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेले अशास्त्रीय व नियमबाह्य स्पीड ब्रेकर हटवावेत आणि शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणीही करण्यात आली. वाहतूक सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्याची मागणी करण्यात आली.
हद्दवाढ भागात क्रीडांगणे,उद्याने,नाट्यगृह व नवीन बसस्थानकाची मागणी - हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी क्रीडांगणे,उद्याने,नाट्यगृह,स्वीमिंग टँक आणि नवीन बसस्थानक यांसारख्या सार्वजनिक सुविधांबाबत अद्याप अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या सुविधा निर्माण करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आले.
आय.टी.पार्क आणि नवीन उद्योगांसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी - सोलापूरमध्ये मंजूर झालेल्या IT पार्कसाठी जागा आरक्षित करणे,आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि नवीन IT व इतर उद्योगांना प्रोत्साहन देणे याबाबत प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सोलापूरला IT आणि सेवा क्षेत्राचे केंद्र बनविण्याच्या दिशेने तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी करण्यात आले.
इतर महत्त्वाचे प्रश्नही बैठकीत चर्चिले - याशिवाय होटगी रोड रस्ता, रामलाल चौक पूल,आसरा पूल,दूषित पाण्याचा प्रश्न,सोलापूर महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार,सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ व ७ चा विस्तार, सोलापूर-कोल्हापूर रात्रीची रेल्वेसेवा,अवैध रिक्षांवर कारवाई आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली.
रॅपिडो ही नागरिकांना उपयुक्त ठरणारी सेवा असल्याने तिच्यावर कारवाई करण्याऐवजी अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी कारवाई करावी,अशी भूमिकाही बैठकीत मांडण्यात आले.
तसेच महानगरपालिकेच्या विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता वाढविण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये डिजिटल डॅशबोर्ड बसवून मंजूर कामे,खर्च,कामाची प्रगती, कंत्राटदार, मुदत आणि सद्यस्थिती याची सार्वजनिक माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी करण्यात आले.
१८ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण - या सर्व प्रश्नांवर शासनाचे आणि प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर भव्य निषेध आंदोलन करण्याचा निर्णय सोलापूर विकास मंचच्या बैठकीत घेण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २० ऑगस्टच्या नियोजित सोलापूर दौऱ्यापूर्वी शहराच्या प्रलंबित विकासकामांबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि संबंधित विभागांना कालबद्ध कार्यवाहीचे निर्देश द्यावेत,हा या उपोषणामागील प्रमुख उद्देश असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
“सोलापूरच्या विकासाचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते न राहता त्यावर प्रत्यक्ष आणि कालबद्ध कार्यवाही झाली पाहिजे. विमानसेवेपासून पाणीपुरवठा,परिवहन,रस्ते,शिक्षण,उद्योग आणि IT क्षेत्रापर्यंत प्रत्येक प्रश्नावर प्रशासनाने जबाबदारी निश्चित करून निर्णय घ्यावा,” अशी भूमिका सोलापूर विकास मंचच्या बैठकीत मांडण्यात आले.
ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा,मिलिंद भोसले,योगीन गुर्जर,विजय कुंदन जाधव,मनोज क्षीरसागर, ॲड.दत्तात्रय अंबुरे,आनंद पाटील,सुहास भोसले,प्रा.प्रसन्न नाझरे,जयश्री तासगावकर,शुभदा पाटील,धनश्याम दायमा,प्रदिप शिर्के,सुनील वडगावकर,प्रशांत भोसले,सुर्यकां पारेकर,ज्ञानेश्वर केदरलिंगे,शिवाजी उपरे,सुशील व्यास,शिरिष शहा, प्रा.धनंजय शहा,प्रकाश भुतडा,सचिन कुलकर्णी,ब्रम्हानंद धडके,नरेंद्र भोसले,रिझवान तांबोळी,मदनमोहन बर्गुल,अर्जुन रामगीर,शफी काझी,रमेश माळवे,ॲड.राजन दिक्षित,सुरज मनियार,भारत पाटील आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.
