मुख्यमंत्र्याच्या वतीने श्रीफळ दहीहंडीसाठी श्रीफळ तोरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पाठवण्यात आले
सोलापूर : तीर्थक्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी स्थळा वर आयोजित श्रीफळ दहीहंडी सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व हजारो भाविकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दहीहंडी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने श्रीफळ तोरण पाठवण्यात आलेले होते.
या कार्यक्रमास आमदार अभिजीत पाटील,आमदार उत्तम जानकर,जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य,जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार,जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,सावता महाराज वसेकर तसेच आदि मान्यवर, अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले,तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर श्रीफळ तोरण माझ्या हस्ते पाठवण्यात आले असून मी ते श्रीफळ दहीहंडीस अर्पण करत आहे,असे त्यांनी सांगितले.
परंपरेनुसार येथे करण्यात येणारा श्रीफळ दहीहंडी सोहळा हा एक आगळावेगळा धार्मिक सोहळा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी श्री पांडुरंग सावता महाराजांच्या भेटीला येतात म्हणून हा कार्यक्रम अनोखा सोहळा म्हणून परंपरेने प्रसिद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.
याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व भक्त भाविकांना कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी भक्तीभावाने सावता महाराज समाधीचे दर्शन घेतले. अरण येथे हा सोहळा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
