बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेतर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सोलापूर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१ व्या पुण्यतिथीनिमित्त भवानी पेठ, घोंगडे वस्ती परिसरातील ‘सदा ईश्वर’ निवासस्थानी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची महापूजा अभयकुमार कांती आणि आनंद सिंगराल यांच्या हस्ते करून पुष्प अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील,नरसप्पा मदकलं,बसवराज जाटगल, सायबणा मुडलं,शरणप्पा डोळे,रवि गड्डम,गंगाराम डोळे, लिंगराज पाटील,विनायक गंधाळकर,सिद्राम डोळे,गणेश डोळे,यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सुरेश पाटील म्हणाले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य,कर्तृत्व आणि दूरदृष्टीच्या बळावर आदर्श राज्यकारभार केला. प्रजेच्या सुख-दुःखाला स्वतःचे सुख-दुःख मानून त्यांनी लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. न्याय,समता,धर्मभावना आणि समाजहिताची त्यांची भूमिका आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.
अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. तरुणांनी त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून शिक्षण,संघटन,संस्कार आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. अहिल्यादेवींनी दाखवून दिलेल्या मार्गावर समाजाने मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असे आवाहन पाटील यांनी केले.
अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ प्रतिमेला अभिवादन न करता त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचा आणि आदर्श कार्याचा प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत करण्याचा संकल्प यावेळी समाजबांधवांनी व्यक्त केला.
नव्या पिढीला अहिल्यादेवींच्या संघर्ष, कर्तृत्व आणि समाजहिताच्या कार्याची प्रेरणा मिळावी,यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचेही यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
