नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे होणाऱ्या आध्यात्मिक चेतना,परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठीची पूर्वतयारी बैठक आज नाशिक येथे पार पडली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रमुख आखाड्यांच्या महंतांशी थेट संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले की,खऱ्या अर्थाने आजपासूनच कुंभपर्वाची सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याच्या केंद्रस्थानी आखाडे, साधू-संत आणि महंत असतात. राज्य शासन सेवक म्हणून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असते. याहीवेळी शासनामार्फत उत्तम सुविधा उभारण्यात येतील. साधू-महंतांचा अनुभव कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी अमूल्य आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग तयारीसाठी होणार आहे. 2015 मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता,मात्र यावेळी अधिक वेळ मिळाल्याने सरकार अधिक चांगल्या पद्धतीने तयारी करत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले की, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ₹4000 कोटींच्या विविध कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून आणखी ₹2000 कोटींच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत. माता गोदावरी निर्मळ आणि प्रवाही राहावी, हेच कुंभाचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी व STP प्रकल्पांसाठी निविदा काढण्यात आल्या असून संबंधित कामे लवकरच सुरू होतील. गोदावरी नदी पात्रात अशुद्ध पाणी जाऊ नये यासाठी सुमारे ₹ 1200 कोटींची कामे प्रस्तावित असून ती पुढील 15 दिवसांत सुरू होतील. गोदावरी नदी प्रवाही राहिली तर ती शुद्धही राहील, म्हणूनच हे नियोजन केले जात आहे. पावसाळ्याचा विचार करूनच सर्व सुविधा उभारल्या जात आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की,आखाड्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. साधूग्रामसाठीची जागा अधिग्रहित करून ती कायमस्वरूपी वापरासाठी देण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्यात येत असून कुशावर्त परिसरातील गर्दी टाळण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी चौंडीच्या विकासासाठी ₹681 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच त्यांनी उभारलेल्या घाटांचेही जतन-संवर्धन करण्यात येईल. कोणतीही अडचण निर्माण होणार नाही,याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कुंभमेळा हे भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे. संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागलेले असते. त्यामुळे हे आयोजन भव्यदिव्य, लक्षवेधी व अविस्मरणीय ठरेल,असा माझा पूर्ण विश्वास आहे,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस मंत्री गिरीश महाजन,मंत्री दादाजी भुसे, सर्व प्रमुख आखाड्यांचे महंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.