"सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात शासन व प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. केंद्र व राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना जाहीर करते व त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासन करते. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समिती ही कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून ही विविध विकास कामे केली जात असतात. पालकमंत्री जयकुमार गोरे हे समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे समिती सचिव म्हणून काम पाहतात व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात."
जिल्ह्यात एकाच वर्षात 62 हजार घरकुले मंजूर-आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला 20 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 मध्ये मागील सात वर्षात 43 हजार 990 घरकुले मंजूर होती त्यापैकी 40 हजार 190 घरकुले पूर्ण झालेले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा- 2 सुरू झालेला असून चालू एकाच आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेतून 62 हजार 950 घरकुले मंजूर केलेली आहेत.
साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घरकुल लाभार्थ्यांना निधीची कमतरता भासत होती अशा वेळेस मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नाने घरकुल लाभार्थ्यांना राज्य हिस्स्यामधून 50 हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 35 हजार रुपये घरकुल बांधकामासाठी व 15 हजार रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील बेघर लाभार्थ्यांच्या आवास प्लस 2024 चे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने भूमिहीन नागरिकांना जमीन वाटप - प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामीण भागातील भूमिहीन नागरिकांना एक रुपये प्रति चौरस फुट दराने जागा देण्यात येणार असून 25 मे 2025 पासून ग्राम पंचायतीच्या वतीने जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दोन हजार भूमिहीनांना घरासाठी जमीन उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वीच जिल्हा प्रशासनाने शासकीय जमीन,अतिक्रमण झालेली जमीन व गायरान जमीन आदींची यादी बनवून लॅन्ड बँक तयार केलेली आहे.
जिल्ह्यात 100 दिवसाच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी - मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केलेली आहे. या आराखड्याचा दुसरा टप्पा अंतर्गत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी लवकरच सुरू होत आहे. परंतु प्रशासन शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही याच पद्धतीने लोकांना उत्कृष्टपणे सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या उपक्रमात शंभर टक्के चांगले काम केलेले आहे.
यावर्षी जिल्ह्याला 934 कोटीचा निधी मंजूर - जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात 702 कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून जवळपास 99.74 टक्के निधी खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 934 कोटी 28 लाखाचा निधी मंजूर आहे. यातून ही सर्व शासकीय यंत्रणांना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे प्रस्तावित करणार आहेत.
खरीप हंगाम नुकसान भरपाई रक्कम 216 कोटी मिळाली - प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 मधील 3 लाख 85 हजार शेतकऱ्यांना 216 कोटी तसेच रब्बी हंगाम 2023 मधील 40 हजार शेतकऱ्यांना 22 कोटी पिक विमा नुकसान भरपाई निधी वितरित करण्यात आलेला आहे. ही रक्कम मिळवून देण्यात शासन व प्रशासनाने खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावून शेतकऱ्यांना दिलासा दिला. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळ उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले असून आपला जिल्हा केळी निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे.
लखपती दीदी योजनेत 473 कोटीचे कर्ज वितरण - लखपती दीदी योजनेत सोलापूर जिल्ह्याला 1 लाख 19 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते, त्यानुसार 1 लाख 25 हजार लखपती दिदी जिल्ह्यात झालेल्या असून उद्दिष्टापेक्षा अधिक काम झालेले आहे. या महिलांना लखपती करण्यासाठी 453 कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य शासनाने 2025-26 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे.
महिला बचत शेतीमाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत - उमेद अंतर्गत पंढरपूर येथील शिवस्वराज्य महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या महिला शेतकरी सदस्यांनी पिकवलेला 2 टन शेवगा दुबई येथे निर्यात केला तर माढा येथील माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या महिला शेतकऱ्यांनी 9 टन पेरू सौदी अरेबिया येथे निर्यात केला. स्थानिक बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या महिला सदस्यांच्या शेतमालाला दुप्पट बाजार भाव मिळाला आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांचे 11 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ओरिसा येथील श्री जगन्नाथ पुरी चे दर्शन घडवून आणलेले आहे.
भू प्रणाम केंद्र ही सुविधा - भूमि अभिलेख विभागाकडून नागरिकांच्या सोयी करीता सोलापूर येथे नगर भूमापन अधिकारी कार्यालय येथे भू प्रणाम केंद्र ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सेतु सुविधा केंद्राच्या धर्तीवर ही सुविधा देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आरोग्य योजनाचा लाभ - महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात 11 लाख 52 हजार गोल्डन कार्ड तयार करण्यात आली आहेत. या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपये पर्यंतचे विमा कवच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या योजनेचे जिल्ह्यात 86 तर जिल्हा बाहेरील अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा दिली जात आहे.
या पद्धतीने सर्व शासकीय यंत्रणा विविध लोक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असून शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकातील लाभार्थ्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल यासाठी काटेकोरपणे नियोजन केले जाते.