विशेष लेख...
सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये,दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत नाही,तर आजूबाजूच्या दऱ्या,खोऱ्या आणि घाटांवर ठेवलेल्या नियंत्रणातही दडलेले आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस 13 कि.मी. वर हा किल्ला असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची 1,092 मी.आहे. पूर्वेकडील बाजूस 340 मी.आणि पश्चिमेकडे 870 मी.खोल दरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांना 1656 मध्ये हा किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली.
प्रतापगड हा बालेकिल्ला आणि त्याच्या सभोवतालचा खालचा भाग,अशा दोन प्रमुख भागात विभागलेला आहे. डोंगराच्या शिखरावर असलेल्या बालेकिल्ल्यात राजवाडा,सदर,केदारेश्वर मंदिरे,पाण्याच्या टाक्या आणि धान्य-रसद साठवणीसाठीच्या कोठाऱ्या यांसारखी महत्त्वाची बांधकामे होती. तर दक्षिण व पूर्व उतारावर बांधलेल्या खालच्या भागात पहिली तटबंदी आणि प्रचंड बुरुज शत्रूला दरीतच अडकवून ठेवण्यासाठी होती.
मुख्य किल्ला,माची आणि बालेकिल्ला असे या किल्ल्याचे तीन भाग होतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ 3,660 चौ.मी. तर मुख्य किल्ल्याचे 3,885 चौ.मी.असून दक्षिणेकडील बुरूज 10 ते 15 मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी रेडका, राजपहारा,केदार इ.बुरुजांचे अवशेष टिकून आहेत. बुरूज वैशिष्ट्यपूर्ण असून निमुळत्या डोंगर धारेच्या शेवटी आहे. या भागाला माची म्हणतात. कारण अशाच स्वरूपाचे बांधकाम राजगड (सुवेळा व संजीवनी), तोरणा (झुंजार) या किल्ल्यांवरील माच्यांना आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी तब्बल 40 फूट उंच असून तिच्या भक्कम रचनेमुळे प्रतापगड अभेद्य बनला होता. संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात केले गेले आहे. गडाच्या उंच बुरुजांवरून जावळीच्या खोऱ्यातील डोंगर-दऱ्यांवर सतत नजर ठेवता येत असे,त्यामुळे शत्रूच्या हालचाली वेळेत ओळखणे सोपे होत असे.
मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे पार करून जावे लागते. दोन्ही दरवाजांवर शरभाच्या प्रतिमा दिसतात. दोन दरवाजे पार केल्यावर तुळजा भवानीचे मंदिर आहे. या देवालयासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. त्या जवळच नगारखान्याची इमारत आहे. भवानी देवीचे मूळ मंदिर दगडी गाभाऱ्याचे होते. 1820 मध्ये सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी तेथे लाकडी मंडप बांधला.
अरुंद,नागमोडी चढणाऱ्या वाटा आणि दारांच्या पुढे लपवलेले मजबूत अडथळे यामुळे कुणालाही सरळपणे गडावर प्रवेश करणे शक्य नव्हते. महादरवाजा तर संरक्षणकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. गोमुखी शैलीत बांधलेला हा दरवाजा रचनेत इतका कुशल होता की,अरुंद मार्गाने आत येणाऱ्या शत्रूंना दोन्ही बाजूंच्या बुरुजांतून सहज हल्ल्याच्या टप्प्यात आणले जाई.
प्रतापगडाचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुसंरचित जलव्यवस्था. किल्ल्यावर चार प्रमुख पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी दोन बालेकिल्ल्यात तर दोन खालच्या भागात आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी नैसर्गिक उतारांचा कुशलतेने वापर करण्यात आला होता. त्यामुळे गडावरील लोकसंख्येला वर्षभर पुरेल इतका पाणीपुरवठा व्हायचा. ही योजना मराठ्यांच्या अभियांत्रिकी व व्यूहनीती कौशल्याचा अद्वितीय नमुना ठरते.
प्रतापगडचे ऐतिहासिक महत्त्व अफझलखान छत्रपती शिवाजी महाराज भेट व त्याप्रसंगी झालेला अफझलखानाचा वध या घटनेमुळे वाढले (1659). छत्रपती राजाराम महाराज सुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले. स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण 1957 च्या नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी केले.
आजही हजारो लोक केवळ त्या क्षणाशी नाते जोडण्यासाठी प्रतापगडावर भेट देतात. गडावर दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अफझलखान भेटीचे नाट्यरूप सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित उपक्रम यामुळे प्रतापगड महाराष्ट्राच्या अस्मिता आणि सांस्कृतिक एकतेचे केंद्र ठरतो.
प्रतापगड मराठ्यांच्या धैर्य,रणनीती आणि स्वराज्याच्या स्वप्नाचा जिवंत साक्षीदार आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा गड आजही भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा एक अढळ दुवा आहे.
युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा मानंकन दिले असून त्यात प्रतापगडाला विशेष स्थान मिळाले आहे. त्यामुळे प्रतापगड आज केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जगाच्या सांस्कृतिक वारशाचा एक अनमोल ठेवा म्हणून गौरवला जातो.
सौजन्य - संजय डी.ओरके विभागीय संपर्क अधिकारी,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय,मुंबई.