Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन'चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारशाचा जागर करणार्‍या सांकृतिक आणि देशगौरवशाली यात्रेचा शुभारंभ!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई येथे 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन'चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला आज 351 वर्ष पूर्ण होत आहेत,या शुभदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन' सुरू करण्यात आलेली आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक स्थळांना घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास जागृत करण्याचे काम करणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगली आक्रमकांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ज्या काळामध्ये संपूर्ण देश पारतंत्र्यामध्ये होता,देशातील अनेक राजे-रजवाडे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारून त्यांच्याअंतर्गत काम करत होते आणि भारतीयांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू होते. अशा काळामध्ये जिजाऊ माँसाहेब यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र करून मावळ्यांची फौज तयार केली. यामुळे शेकडो वर्षांनी पहिल्यांदा आपल्याला स्वातंत्र्य काय असते हे पाहायला मिळाले. यातून असे एक स्वराज्य तयार केले जे पुढे अटकेपर्यंत विस्तारीत झाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,ज्यादिवशी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता, त्या शुभदिनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून, छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची भारत गौरव यात्रा ट्रेन सुरू होत आहे याचा आनंद आहे. यातून 700 पेक्षा अधिक यात्री प्रवास करत आहेत ज्यामध्ये चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज सगळ्या भागातील लोकांचा समावेश आहे. यात 150 महिला आहेत तर यातील 80% लोक 40 वर्षांच्या आतील आहेत,जे आपल्या शिवरायांचा इतिहास अनुभवण्यासाठी जात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,आज शिवराज्याभिषेक दिनी या ट्रेनचा पहिला मुक्काम हा रायगड येथे होणार आहे.  १) स्वराज्याची राजधानी रायगड २) छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी३) प्रतापगड४) लाल महाल पुणे येथील संपूर्ण देव,देश आणि धर्माचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी 
अशा प्रत्येक ठिकाणी ही ट्रेन जाणार आहे. यासोबतच कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन करत अतिशय प्रेरणादायी यात्रा या ट्रेनच्या माध्यमातून यात्रेकरूंना करता येणार आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे विभागाने त्यांच्या राहण्याची व खाण्याची अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव तसेच संपूर्ण रेल्वे विभागाचे आभार मानले. 

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री ॲड. आशिष शेलार आणि इतर मान्यवर तसेच या पहिल्या ट्रेनने प्रवास करणारे सौभाग्यशाली प्रवासी उपस्थित होते.