मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर,नरिमन पॉईंट,मुंबई येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार वितरणासाठी पुढील वर्षी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करू. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमातील सर्वात देखणा पुरस्कार कार्यक्रम मंत्री संजय शिरसाट यांनी आयोजित केला. भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे ते अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
जगातील सर्वोत्कृष्ट संविधान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी संविधानाचे दर्शन घेतले. या संविधानाच्या माध्यमातूनच देशाची प्रगती होणार असल्याचे,त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 'घरोघरी संविधान' कार्यक्रम राबविण्यात आला असून संविधानाची उद्देशिका आपल्या जीवनामध्ये अंगीकारली,तर देशातील 90% अडचणी दूर करता येतील,असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
समाजाच्या विकासाकरिता आणि उत्थानाकरिता विविध क्षेत्रात ज्या व्यक्ती काम करतात अशा व्यक्तींच्या मागे सरकार मजबुतीने उभे आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजातील सर्व घटकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी शासन राबवित असलेल्या योजना व उपक्रमांचा विस्तृत आढावा घेतला तसेच सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवला नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जाती जमातीतील नोंदीत कुटुंबाना यावर्षीच घरे देणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम आवास योजनेच्या माध्यमातून 30 लाख घरे महाराष्ट्रासाठी दिल्यामुळे राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय मंत्रिमंडळात 60% सदस्य अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील आहेत. केंद्र व राज्यसरकार अनुसूचित जाती व जमातीच्या मागे ताकदीने उभे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड,मंत्री भरत गोगावले,आमदार संतोष बांगर,सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.