Ticker

6/recent/ticker-posts

१४ एप्रिल - संकल्प दिवस

          
भूक लागली अन् खायला मिळाले नाही तर माणूस दुःखी होतो,कष्टी होतो.कासावीस होतो.विव्हळतो.उदास होतो,नाही का?  पोटात अंधार असल्यामुळे कशातच लक्ष लागत नाही.  त्याचप्रमाणे अन्याय अत्याचारानेही माणूस खचला जातो.  खरे तर यशस्वी जीवन जगण्यासाठी व जीवनकाळ सुरळीत चालण्यासाठी जशी अन्न,वस्त्र,निवाऱ्याची गरज लागते तशीच सन्मानाची,स्वाभिमानाचीही गरज लागते.  पण अशावेळी कुणी मदतीला धाऊन आले,आधार झाले की त्या उपकाराची फेड कशी करावी,म्हणून माणूस विचारात पडतो.अशी माणसे नेहमी हवी हवीशी वाटायला लागतात व कायम स्मरणातही राहून जातात.

          


हजारो वर्षे शोषित,पीडित,वंचित माणसे जनावरांहूनही बेहत्तर गुलामीचे जीणे जगत होती.किड्या मुंग्याप्रमाणे राहात होती.मूलभूत गरजा मिळण्यासाठी हजारो वर्षांपासून तडफडत होती.अंधारातून बाहेर पडण्यासाठी चाचपडत होती.धडपडत होती.पण विषम व्यवस्थेमुळे,अज्ञानामुळे आणि हतबलतेमुळे रूढीच्या चिखलात फसली होती.  त्यातून बाहेर कसे यायचे हेच त्यांना कळत नव्हते.जणू माणूस म्हणून कुणी त्यांना स्विकारत नव्हते.त्यांच्याबद्दल कुणालाही दया येत नव्हती.पण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा भीमसूर्य १४ एप्रिल १८९१ ला उगवला आणि कायमचा अंधार दूर झाला.हा प्रकाश घरोघरी डोंगर दऱ्यात, आसमंतात पोहचू लागला.माणसे जागवू लागला.  गुलामाला गुलामीची जाणीव करू लागला.विषमतेच्या भिंती तोडू लागला.समतेची दालने उघडू लागला.चाचपडणाऱ्या माणसांना रस्ता दाखवू लागला.फार कष्टातून व त्यागातूनच थंडी,ऊन पावसाच्या कळा,झळा,वादळे सोसू लागला.  त्यामुळेच माणसांना दूरवरचे दिसायला लागले.नवी दृष्टी यायला लागली.ऊर्जा मिळायला लागली.आसमंतातील किल्मिश दूर व्हायला लागली.भीमसूर्याच्या आगमनाने जणू सृष्टीचे रूपच पालटून गेले.त्या प्रकाशाने माणसांना माहीत नसलेले जग माहीत व्हायला लागले.नैराश्य संपले.हास्य पसरले.आशेचा किरण दिसू लागला.चाचपडणाऱ्यांना चक्रव्यूहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.जो तो आनंदाने बेफाम झाला.समाधानाने नाचायला लागला. स्वातंत्र्याचे गाणे गायला लागला.तेजस्वी झाला.निर्भय झाला. वसंताच्या आगमनाने जसे सृष्टीचे सौंदर्य वाढावे, रूप पालटावे,अगदी तसेच माणसांच्या आयुष्याला या भीमसूर्यामुळे चैतन्याचे,उत्साहाचे,तेजाचे उधाण येऊ लागले.  हा भीमसूर्य वसंतासारखा मानवी जीवनात हास्य फुलवू लागला.सर्वांच्या नसानसात चैतन्य भरू लागला.उभारी देऊ लागला.ऊर्जेचं टॉनिक देऊ लागला.ताण-तणावाचा शिणभाग दूर करू लागला.भीमसूर्याच्या प्रभावामुळे माणूस नवीन नवीन शिकू लागला आणि माणूस माणसात बसू लागला.  चालू लागला.बोलू लागला.लिहू लागला.स्वतंत्र व्यवसाय, कामधंदा करू लागला.जगाची भ्रमंती करू लागला.  सन्मानाचे जीवन जगू लागला.इतरांशी रोटीबेटी व्यवहार होऊ लागला.आपले अस्तित्व शोधू लागला.भेदाभेदाच्या भिंती तोडू लागला.मैत्रीचा परिसर वाढवू लागला.इतके महान कार्य भीमसूर्याच्या उजेडामुळे होऊ लागले.दरवर्षी १४ एप्रिल या महान दिवसाच्या आगमनाची आठवण जगातील प्रत्येक माणूस आतुरतेने करताना दिसतो.त्या दिवसाचा जल्लोष करतांना दिसतो.ढोल ताशांच्या गजरात नगारे वाजवतांना दिसतो.उल्हासित होतांना दिसतो.  
          
कारण तो त्यांचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस.भीमसूर्याचे गुणगान करण्याचा दिवस.परिवर्तनाचा दिवस.नव्या नवलाईचा‌ दिवस.संकल्पाचा दिवस.मनातील संकल्प पूर्णत्वास जाईल,भरभराट होईल,या आशेने सजलेला हा दिवस.
          
याच कालखंडात निसर्गातील प्रत्येक झाड फुलून येते.  बहरून येते.तसेच ह्या दिवसाने जीवन खुलून येते.फुलून येते. जीवनाला सुगंध येतो.बहर येतो.अस्तित्वाची जाणीव करणारा हा दिवस.नव्या संकल्पाची,नव्या उमेदीची,नव्या आशेची पायाभरणी करणारा हा दिवस.आशा पल्लवित करणारा हा दिवस.या दिवसाचा संकल्प काय आहे?  गतिमान होत राहणे,एकमेकांना समजून घेणे.एकमेकांशी सलोख्याने वागणे.मदत करणे, इतरांचे ऐकून घेणे.इतरांना वेळ देणे.  इतरांसाठी जगणे.इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणे.ही ह्या धकाधकीच्या काळातील आव्हाने आहेत.  त्यासाठीच त्या महामानवाने सर्वांसाठी आपले जीवन खर्ची घातले.सर्वांना सावरले.सांभाळले.पुढ्यात ताट वाढले.  भीमसूर्याच्या अर्थात बाबासाहेबांच्या त्यागामुळे,कष्टामुळे माणसाला सर्व काही आयते मिळाले.
          
लोकांच्या हातात पैसा खेळू लागला.भरभराट झाली.  जवळपास ६८ वर्षे झालीत.प्रगतीचा आलेखही वाढला.  जुनी पिढी गेली.नव्या पिढीचा आजचा प्रवास सोयीचा झाला.पण आजच्या पिढीने बाबासाहेबांकडून काय घेतले?  बाबासाहेबांना डोक्यावर का डोक्यात? बाबासाहेबांना बरोबर समजून घेतले का? वाचन संस्कृती वाढवली का? आजचा माणूस इतिहास विसरू लागला,असे वाटत नाही का?  माणूस माणसापासून दूर चाललाय.माणुसकी विसरत चाललाय असे वाटत नाही का? आज माणूस माणसाला जुळवून घेतोय का? मिळवून घैतो का? समाजाशी बांधिलकी ठेवतो का? आज कुणाला कुणाशी भेटायला,बोलायला वेळ नाही.पण रात्रंदिवस मोबाईलवर खेळायला वेळ आहे.या गोष्टीला काय म्हणावे? आजचे जग घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावतांना दिसते. एकमेकांशी संपर्क करणे, एकमेकांची विचारपूस करणे जणू कालबाह्य झाल्यासारखे वाटत आहे.काही लोक बाबासाहेबांच्या विचारांवर चालतांना दिसतात.काही लोक बाबासाहेबांना समजून घेण्याच्या मार्गावर आहेत तर काहींना अजून बाबासाहेब बरोबर समजलेच नाहीत.ते कित्येक कोसो दूर आहेत,त्याचे काय?  त्या महामानवाच्या जयंती महोत्सवानिमित्त फक्त जल्लोष करायचा.पण त्यांच्या विचारधनाचे काय? तो कालचा इतिहास आठवण करून देतो की,अरे माणसा काल कुठे होतास? आज कुठे आलास? तू कालची जागा भुललास?  तू प्रगतीचे पंख लावलेस. उंच आकाशात उडू लागला.भरारी मारू लागला. पण तू कुठवर पोहोचला? त्याचे गुणगान करणारे व तू आजवर काय काय मिळविले,हे सांगणारे जर सोबतीला नसतील तर त्याचे महत्त्व काय? कोसो दूर मागे असणाऱ्यांना कधी हात दिलाय का?  कुणाशी कधी मैत्री केली का? आकाशात उंच उडणाऱ्याने कधीतरी पृथ्वीवरील एकत्र राहणाऱ्या प्राण्यांच्या कळपाला बघावे.आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याला बघावे.फुला फुलांवर एकत्र उडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांना बघावे.  वारुळात एका रांगेने जाणाऱ्या मुंग्यांना बघावे.ते सर्व शिस्तीने एकसंघ सोबत राहण्याची शिकवण देतातच ना?  सोबत उडतातच ना? मुक्त व स्वच्छंदी जीवनाचा आनंद लुटतात ना? जे मुक्या पशूपक्ष्यांना जमते,ते माणसाला का जमू नये? हाच तर भीमजयंती साजरे करण्याचा उद्देश आहे.संकल्प आहे, बाकी काय?
                 
एकीचा बार
     
भीम जयंतीला नवा हा साज चढवा
चला वाजत गाजत एकीचा बार आता उडवा ।धृ०।

     भीम क्रांतीची भाषा थोडीशी समजून घेऊ
     सारा इतिहास तो जतन करून ठेऊ
     चला मैत्रीची हाक साऱ्यांना आता देऊ
     आम्ही एकच आहोत मिळून जगाला जाऊ
     अहो बेकीला पळवा हा निरोप साऱ्यांना कळवा

     थोड्या थोड्या हो साठी कशाला करताय वाद
     त्याच्यामुळेच होतील तुमच्यात मतभेद
     गोड गोड शब्दाने चला करू संवाद
     जोडू एक एक माणूस होईल सारं आबाद
     अहो प्रेमानं प्रेम, रोजच रोज वाढवा
     
     शाम परि हो दादा जगतात कितीक लोक
     नका दुखवू कुणाला नको ती चिखलफ
     भीम विचारानेच होऊया सारे एक
     लुटू आनंद ह्या जीवनाचा हो बिनधोक
     अहो स्वतःला घडवा तुम्ही पण किंमत मिळवा

सौजन्य- लेखक,शामराव दिपाजी वाकोडे