एक गाव एक गणपती करणाऱ्या धामणगावकरांचा स्तुत्य निर्णय.
सोलापूर : दि.२३ (प्रतिनिधी) बार्शी तालुका वैराग येथील बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी विसर्जन करताना पाण्यात बुडून भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाणवठ्याच्या ठिकाणी विसर्जन करताना सुबक गणेश मूर्ती फुटल्याची विदारक चित्रे समाजमाध्यमातून फिरली. धामणगाव (दू) ता.बार्शी येथील गावकर्यांनी एक गाव एक गणपती असा आदर्श उपक्रम राबवल्यानंतर विसर्जणाचाही स्तुत्य निर्णय घेतला आहे. सहा फूट उंचीची देखणी,सुबक मूर्ती पाण्यात विसर्जित न करता कारागिराला परत दिली.
गणेशोत्सव कालावधीत भास्करराव पेरे पाटील,खंडोजी डोईफोडे,प्रा.रोहित देशमुख अकलूजकर,दिपक देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यासोबतच भजन कीर्तन व लहानग्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या. वैराग पोलिस स्टेशनचे अधिकारी पो.नि.निवृत्ती मोरे व कर्मचाऱ्यांनी विविध वृक्षांच्या दोनशे रोपांचे ग्रामस्थांमध्ये वाटप करुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. विसर्जन करतेवेळी मूर्ती कारागिराला परत दिल्याने तिचा पुनर्वापर होईल शिवाय जलप्रदूषण होणार नाही.
चौकट - एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवल्याने गट-तट,संघर्ष,द्वेष,ध्वनिप्रदूषण,राजकीय कुरघोडी असे बहुतांश गणपती उत्सवातून जाणवणारे साईड इफेक्ट जाणवले नाहीत. त्यामुळे मी याला आयुर्वेदिक गणपती उत्सव असे म्हणेल. - किसन भोसले,जेष्ठ नागरिक धामणगाव ता बार्शी.