Ticker

6/recent/ticker-posts

‘लोकमाता अहिल्याबाई होळकर - अ‍ॅन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल पुस्तकाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव

‘लोकमाता अहिल्याबाई होळकर - अ‍ॅन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल पुस्तकाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते आज ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर - अ‍ॅन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परकीय आक्रमकांनी नष्ट केलेल्या भारतीय संस्कृतीच्या पुनर्निर्माणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेले योगदान आपण कधीही विसरु शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडलेला शौर्याचा आणि न्यायाचा विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पुढे नेण्याचे कार्य केले. म्हणूनच अहिल्यादेवी होळकर यांना लोकांनी ‘पुण्यश्लोक’ ही पदवी दिली,असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोककल्याणाचे कार्य करत असतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पहिल्यांदा महिला सेनानींची तुकडी तयार केली, विविध कारागीर यांच्यासाठी तयार केलेल्या बाजारपेठेला राष्ट्रीय दर्जा देण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले, देशभरात पेशावरपासून रामेश्वरपर्यंत आणि कराचीपासून प्रयागराजपर्यंत व महाराष्ट्रामध्येही मंदिरांचे, घाटांचे पुनर्निर्माण करण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले, कावड यात्रेची परंपरादेखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुरु केली.”

राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तयार केलेले तलाव व भक्तीस्थळे यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर - अ‍ॅन इटरनल फ्लेम’ हे कॉफी टेबल बुक अतिशय सुंदर झाल्याचे सांगितले. तसेच या कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रती देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सर्व कॅबिनेट मंत्र्यांना आणि मुंबई व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांना पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी चिरंतन आदर्श ठरावा यासाठी राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केले असून आता त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त व्यावसायिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, कवी प्रसून जोशी, कॉफी टेबल पुस्तकाचे लेखक-संपादक अंबरीश मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.